
धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदार आपला लोकशाहीचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा समिती, धाराशिवने शहरातील नागरिकांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. समितीने स्पष्टपणे सांगितले की ती कोणत्याही राजकीय पक्षाला, गटाला, नेतृत्त्वाला किंवा कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे उघड–छुपे समर्थन देत नाही. तसेच कोणाविरुद्धही समितीचा विरोध नाही.
समितीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे की, धाराशिवकरांनी कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला, दबाव-धाकाला किंवा जातीय-समूह आधारित लालसेला बळी न पडता स्वतः सक्षम, स्वच्छ, प्रामाणिक आणि समाजहिताचे कार्य करणार्या उमेदवारांना आपल्या बहुमूल्य मतांचा वापर करून योग्य निर्णय घ्यावा. नागरिकांनी विवेकाने, स्वविवेकाने मतदान करून धाराशिवच्या विकासाला हातभार लावावा, अशा शब्दांत समितीने आपले नि:पक्ष आणि लोकशाहीपर आवाहन जाहीर केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल सिरसट, शहराध्यक्ष संतोष घोरपडे, तालुकाध्यक्ष बबलू भोईटे, रिक्षा अध्यक्ष तुषाल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.


