आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष
मुंबई: धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांना काही महिन्यांपूर्वी स्थगिती देण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडली होती. मात्र, आज (दि. ९ सप्टेंबर) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत या स्थगितीवर पुनर्विचार होऊन ती उठविण्याचा आदेश निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या (डीपीडीसी) कामांना राजकीय कुरघोडी आणि ‘इगो’ आड आल्याने जवळपास 256 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना थेट स्थगितीचा ‘कागदी बांबू’ घालण्यात आला आहे. याचा मोठा फटका जिल्ह्यातील विकासप्रक्रियेला बसला आहे. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, आरोग्य सुविधा, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधा उभारणीसारखी अनेक कामे रखडून पडली आहेत. स्थगितीमुळे मंजूर प्रकल्पांचे काम थांबले असून, आधीच सुरू असलेल्या योजनाही अपूर्ण राहिल्या आहेत. निधी वितरण थांबल्याने प्रशासनाकडे हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अपेक्षित सोयीसुविधा मिळण्यात विलंब होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींनी या स्थगितीविरोधात नाराजी व्यक्त केली असून, तातडीने निर्णय घेऊन कामांना गती देण्याची मागणी केली आहे. स्थगितीमुळे रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यासह अनेक विकास प्रकल्प अडथळ्यात आले होते. जिल्ह्यातील जनतेमध्येही नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावाही केला होता. दरम्यान, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या स्थगितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जर स्थगिती उठवली गेली, तर थांबलेली विकासकामे पुन्हा सुरू होऊन धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.
🔹 *मंत्रिमंडळ बैठकीकडे अपेक्षेची नजर*
आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होऊन स्थगिती उठविण्याचा निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर आदेश निघाले, तर जिल्ह्यातील विकासकामांना पुन्हा गती मिळणार आहे.
🔹 स्थानिक विकासासाठी दिलासा
स्थगिती उठवल्यानंतर निधी वितरण, मंजूर प्रकल्प आणि नवीन योजनांना गती मिळेल. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, शेती व ग्रामीण भागातील प्रकल्पांना याचा थेट फायदा होईल.